मुंबई - कोणत्याही निर्मात्याकडून चित्रपटलेखकांची मानधन व श्रेयाच्याबाबतीत फसवणूक होऊ नये, यासाठी लेखकाचे ना हरकत पत्र असल्याशिवाय कोणत्याही मराठी चित्रपटाला अनुदान दिले जाणार नाही, त्या दृष्टीने शासकीय पातळीवरुन नक्की कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. श्री. विनोद तावडे यांनी मानाचि लेखक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले. मानाचिच्या सहकार्याने राज्यभरात विविध विद्यापीठांच्या माध्यमातून नवोदित लेखकांसाठी कार्यशाळा घेण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
मालिका, नाटक व चित्रपट माध्यमांतील लेखकांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र आलेल्या ‘मानाचि’ लेखक संघटनेच्या शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. तावडे यांची भेट घेऊन लेखकांच्या समस्या मांडल्या. मानाचिचे अध्यक्ष सचिन दरेकर, उपाध्यक्ष राजेश देशपांडे, सचिव श्रीनिवास नार्वेकर,लेखिका मनिषा कोरडे, ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, लेखक विवेक आपटे, चित्रपट समीक्षक श्रीकांत बोजेवार यांचा शिष्टमंडळात सामावेश होता.
लेखक हा चित्रपटाचा मुलभूत घटक असूनही चित्रपट लिहून पूर्ण झाल्यानंतर अनेक वेळा निर्मात्याकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि मानधन व श्रेय याबाबतही टाळाटाळ केली जाते, याकडे शिष्टमंडळाने श्री. तावडे यांचे लक्ष वेधले. ही फसवणूक टाळण्यासाठी निर्मात्यांना लेखकाचे ना हरकत पत्र अपरिहार्य करावे व त्याशिवाय त्या चित्रपटाचा अनुदानासाठीही विचार करण्यात येऊ नये, तसेच लेखकाच्या ना हरकत पत्राशिवाय चित्रपट सेन्सॉरसंमत न होण्याच्या दृष्टीनेही केंद्रीय स्तरावर शासनाच्या वतीने शिफारस करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
मालिका व अन्य लेखनाच्या स्वामीत्व हक्कांबाबत लेखकांवर होणार्या अन्यायाकडेही शिष्टमंडळाने लक्ष वेधले. नव्या लेखकांच्या जडणीघडणीसाठी मानाचिची उद्दीष्टपूर्ती करणार्या उपक्रमांना आपण नेहमीच सहकार्य करु, असे सांगून श्री. तावडे यांनी नव्या उदयोन्मुख व होतकरु लेखकांसाठी राज्यभरात बीएमएम महाविद्यालयांच्या सहकार्याने महाविद्यालयीन, विद्यापीठीय पातळीवर लेखन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याची सूचना केली. नेमकेपणाने विचारपूर्वक वापर करण्यात आल्यास कमी आसन क्षमतेची एलईडी यंत्रणा असलेली नाट्यगृहे उभारण्याचा विचार करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
स्नेहांकित,
श्रीनिवास नार्वेकर
सचिव,
मानाचि लेखक संघटना